सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बनले आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ; इव्हेंट वर लाखो रुपयांचा खर्च; विद्यार्थी व शिक्षक संघटनांचा विरोध
पुणे : विद्यापीठ ही संशोधन व शिक्षणाचे आदान प्रदानाचे केंद्र समजली जातात परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भलतेच उद्योग सुरू आहेत. प्रत्येक गोष्ट एक इव्हेंट म्हणून साजरा करण्याची विद्यापीठ व विद्यापीठाच्या विभागांना जणू सवयच लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अलीकडे महागाईच्या काळात संस्था अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर देतात परंतु विद्यापीठ प्रशासन तसं करताना दिसत नाही. आता म्हणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने क्यूएस जागतिक क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले असून विद्यापीठाला जागतिक स्तरावर ५६६ वे स्थान मिळाले म्हणून यासाठी विद्यापीठातील अधिकारी व मोजक्या आमंत्रितांसाठी एक भव्य दिव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी यावर लाखो रुपयांचा खर्च होणार असून हा अनावश्यक खर्च असुन यांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आहे अशी टीका विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या म्हणून मागणी केली अथवा शिक्षकांना संशोधनासाठी मदत करा अशी मागणी केली की विद्यापीठ प्रशासन निधीची कमतरता असे कारण देऊन संबंधिताची बोळवण करते परंतू विद्यापीठ सवंग प्रसिद्धी साठी विद्यापीठ प्रचंड खर्च करते हे पुर्णतः चुकीचे असून विद्यापीठ प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
–डाॅ. हर्ष गायकवाड , अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठात अनेक समस्या
एकीकडे इव्हेंट वर लाखो रुपयांचा खर्च होत असतांनाच हा खर्च विद्यार्थ्यांकडुन विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क इत्यादी मध्ये वाढ करून वसुल केला जात आहे. तसेच नवे कोर्स सुरू केले जात आहेत, परंतु विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाहीत.अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या असतांनाच विद्यापीठ प्रशासन मात्र इव्हेंट साजरे करण्यामध्ये व्यस्त असल्याचे प्रतिक्रिया विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी व्यक्त केल्या आहेत.
विद्यार्थी व शिक्षक संघटनांचा आरोप
विद्यापीठावर विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी आरोप केला आहे की ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बनले आहे. दर महिन्याला मोठे-मोठे इव्हेंट आयोजित केले जात आहेत, ज्यावर लाखो-कोटी रुपये खर्च केले जात आहेत. विद्यार्थ्यांना या इव्हेंट्समध्ये सामावून घेतले जात नाही शिवाय अशा इव्हेंट कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हित साध्य होतांना दिसत नाही.
एकीकडे विद्यापीठ वर्षानुवर्षे आर्थिक तूट अनुभवत आहे, विविध योजना अर्धवट राहतात, गरजू विद्यार्थ्यांना पुरेशी सुविधा दिल्या जात नाहीत. आणि दुसरीकडे इव्हेंटवर असा खर्च? हा निधी विद्यार्थ्यांचाच आहे त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी, शैक्षणिक सुधारणांसाठी, आणि सुविधा उभारण्यासाठी असावा. केवळ प्रशासकीय आनंदासाठी वापरणं चुकीचं आहे.
–अँड.कुलदिप आंबेकर, अध्यक्ष, स्टूडंट हेल्पिंग हँडस
विद्यार्थी व शिक्षक संघटनांच्या तर्फे प्रश्न उपस्थित
विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचे हित जपले जात आहे का? किती विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे? असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठ प्रत्येक गोष्ट एक इव्हेंट म्हणून साजरी करते त्यामुळे विद्यापीठ एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बनले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना काय फायदा होत आहे. याविषयी विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे.
– राहुल ससाने , अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती














Leave a Reply