शरदाचे टिपूर चांदणे अनुभवा – डॉ पराग काळकर
यावेळी खूप लांबलेला पावसाळा आता संपत आला आहे आणि आकाश निरभ्र झाले आहे. पावसाळा नुकताच संपल्यामुळे वातावरणातील धूलिकण कमी झाले आहेत. अशा स्वच्छ वातावरणात, आकाशातील चांदण्यांची आणि चंद्रप्रकाशाची नयनरम्य गंमत अनुभवण्याचा सुंदर योग या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आला आहे. सध्याच्या काळात कृत्रिम प्रकाशामुळे नैसर्गिक चंद्रप्रकाशाची मजा आणि टिपूर चांदण्याची अनुभूती सहजपणे घेता येत नाही. म्हणून, आपण आपल्या इष्टमित्रांसोबत आणि परिवारासोबत जवळपासच्या एखाद्या बागेत अथवा डोंगरावर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आणि चंद्राच्या शीतल चांदण्याचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे.

चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्राच्या षोडश कलांमुळे आणि उगवण्याच्या वेळांमुळेच समुद्राला भरती-ओहोटी येत असते. पूर्ण चंद्रासारखेच तुमचेही आयुष्य उजळून जावो, आनंददायक आणि आल्हाददायक घटनांनी जीवन प्रफुल्लित आणि पुलकित होवो, ही सदिच्छा! जीवन म्हणजे सुख-दुःखाचा मेळ आहे. जीवनात जरी एखाद्या वेळी अमावस्येच्या रात्रीसारखा काळोख भासला, तरी निश्चितपणे चंद्राची कोर पुन्हा उगवणार आहे, याची खात्री बाळगा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात चंद्राची शीतलता आणि टिपूर चांदण्यांसारखे शुभ्र, उज्वल यश निश्चित येवो ही प्रार्थना.
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपले आयुष्य परिपूर्ण व्हावे आणि जीवनात शीतलता भरून राहावी. कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


















Leave a Reply